शुक्रवार, 28 मार्च 2014

यांना लाज कशी वाटत नाही?

भारत देश म्हणजे धर्मशाळा झाला आहे असे म्हटले जाते. ते सत्य असल्याचे वारंवार प्रत्ययास येत असते. देशात प्रचंड संख्येने बांगलादेशी नागरिक घुसले आहेत. हे वास्तव आता शासनाने स्विकारले आहे. परंतु एकगठ्ठा मतांच्या लालसेपोटी सत्ताधारी या बांगलादेशी नागरिकांच्या अंगाला हात लावू इच्छित नाही. केवळ लांबून इशारे द्यायचे आणि प्रत्यक्षात काहीही करायचे नाही हा मुर्खपणा खुलेआम सुरु असतो. आणि बहुसंख्य जनता देखिल त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानते. आज या बांगलादेशी मतांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात देशाची आणखी एक फाळणी झाली तर नवल वाटायचे कारण नाही.
आता तर केंद्रिय गृहमंत्रालयातील विदेशी विभागातील अवर सचिव विकास श्रीवास्तव यांनी तर कमालच केली आहे. त्यांनी हायकोर्टात चक्क शपथपत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, बांगलादेशी नागरिकांची देशात मोठ्या प्रमाणात घुसखोर होत आहे. आर्थिक, राजकीय व इतर कारणांनी स्थलांतरित झालेल्या बांगलादेशींना हुडकून काढणे अत्यंत कठीण आहे. त्याचप्रमाणे देशात किती बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्य करीत आहेत याची नेमकी माहिती देता येणार नाही.
आता याला काय म्हणावे? मायबाप शासनच जर उघडपणे बांगलादेशी नागरिकांची बाजू घेणार असेल तर त्या सरकारला काय अर्थ आहे? आपल्या घरात रस्त्यावरील कोणीही राहण्यास आला तर ते आपण सहन करतो का? नाही ना! मग देशात लाखो बांगलादेशी निर्धास्तपणे वास्तव्य करीत आहेत आणि शासन म्हणते त्यांना हुडकून काढणे आम्हाला शक्य नाही. मग तुम्हाला काय शक्य आहे ते तरी सांगा असाच सामान्यांचा सवाल आहे. आज देशातील 50 हून अधिक मतदारसंघ असे आहेत की जेथे अल्पसंख्यक मतांच्या जोरावर जनसेवक निवडून येतात. त्यामध्ये बांगलादेशी नसतील असे आपण म्हणू खात्रीने सांगू शकतो का? मतांच्या लाचारीसाठीच सरकार बांगलादेशी घुसखोरांना लाथ मारुन बाहेर काढण्यास कचरत आहे. जर त्यांना आपण हाकलले तर आपल्याला मुस्लिमांची मते पडतील का? हाच प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. परंतु येथील राष्ट्रवादी मुस्लिमांचा कधीच बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा नव्हता आणि नसेल.
आता या बांगलादेशी घुसखोरांना सरकारने गालीचे अंथरले आहेतच. त्याचाच परिपाक म्हणजे देशात दहशवादी कारवाया वाढत चालल्या आहेत. मागील काही दिवसात सरकारने इंडियन मुजाहिदीन या आंतकवादी संघटनेच्या खतरनाक अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यांना स्थानिकांचे सहकार्य असल्याशिवाय हे शक्य आहे का? घुसखोरांना आश्रय दिल्यावर दुसरे काय होणार? घुसखोरांना हुडकून काढणे अशक्य असल्याचे सांगणार्‍या सरकारला काहीही वाटत नसले तरी सरकारच्या विचारसरणीची सामान्यांना आज लाज वाटत आहे.

 

सोमवार, 24 मार्च 2014

आयुष्याचे जीवनगाणे

प्रत्येकाचा मनुष्यस्वभाव हा निराळा असतो. एखाद्याला एका गोष्टीत आनंद दिसला तर दुसर्‍याला तसे दिसेलच याची काही शाश्‍वती नाही. हे म्हणणे पटावे यासाठी नेहमी एक उदाहरण दिले जाते. दोन माणसांच्या समोर एक पेला ठेवला त्यामध्ये थोडे पाणी भरले आणि त्यांना विचारले की पेल्याचे वर्णन करा. तर त्यातील एकजण म्हणेल की, हा पेला अर्धा रिकामा आहे. तर दुसरा म्हणेल की, हा पेला अर्धा भरलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जीवनाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो हे महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दु:खाचे डोंगर असतात त्याचप्रमाणे सुखाच्या काही टेकड्याही असतात. परंतु आयुष्याच्या वाटेला दु:ख आले म्हणून रडत बसायचे? की त्याचा धीराने सामना करायचा? हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते.
आजकालची पिढी ही सुखवस्तु आहे. म्हणजे लहानपणापासूनच पालक मुलांचे वाट्टेल ते हट्ट पुरवितात.साहजिकच मुलांच्यात नकार पचवायची ताकदच नसते. साहजिकच कोणतीही मनाविरुध्द गोष्ट झाली की चिमुकल्यांपासून महाविद्यालयीन युवक – युवतींपर्यत अनेकजण आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. मागील काही वर्षाचा आढावा घेतला तर आपल्याला आत्महत्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. सतत होकाराची सवय लागली असल्याने अनेकांना नकार म्हणजे जीवनातील सर्वात मोठे संकट वाटते. आणि ते आपले जीवन संपवितात. परंतु आपल्या मागे आई – वडिलांची मनस्थिती काय होईल याचा कोणीही विचार करताना दिसत नाही.
जीवन हे अनमोल असते. परंतु जीवनाचे मूल्य फार कमी जणांना कळते. इतर प्राणी आणि मनुष्य यामध्ये महत्वाचा फरक असतो. तो म्हणजे इतरांना विचारशक्ती नसते. मनुष्याला असते. अर्थात या विचारशक्तीचा वापर कसा करायचा? हे मात्र ज्याचे त्याने ठरवायचे असते. दुर्देवाने आज तेच होताना दिसत नाही. जो तो आपल्याची विचारविश्‍वात रममाण झालेला आपल्याला पाहायवास मिळतो. मी आणि माझे एवढेच अनेकांची विश्‍व बनते. आपण सुखी झालेच पाहिजे परंतु त्याचबरोबरीने समाज देखिल अधिकाधिक कसा सुखी होईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जीवन हे क्षणभंगुर आहे. आपण आज आहे उद्या असू की नसू हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळेच आपल्याला मिळालेल्या जीवन देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी कसे सार्थकी लागेल हेच पहावे लागेल. कित्येकजण जीवनाला दोष देण्यातच धन्यता मानतात. अशा महाभागांनी जरा आठवड्यातून एकदा स्मशानात जाऊन यावे म्हणजे त्यांना जीवनाचे महत्व पटेल. आपल्या जीवनाचा उपयोग इतरांसाठी  कसा होईल हे प्रत्येकाने पाहिेले तर अनोखे जीवनगाण्याचे स्वर आसमंतात घुमतील आणि ते निश्‍चित मधुर असतील हे नक्की!

बुधवार, 19 मार्च 2014

इंटरनेटव्दारे फसवणूक चिंताजनक !

आजकाल विविध ‘ डे ‘चा जमाना आहे. पण केवळ ‘ डे ‘ साजरे करण्यापेक्षा त्यामागील विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आता हेच घ्या ना! दि. १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला . ग्राहक खरेच जागरुक असतात का? हाच महत्वाचा प्रश्‍न आहे. प्रामुख्याने इंटरनेटव्दारे होणार्‍या फसवणूकीचा विषय चिंताजनक आहे. त्यासंबंधात विचारमंथन करणे गरजेचे आहे.
मागील आठवड्यात वर्तमानपत्रात ऑनलाईन शॉपिंग व्दारे झालेल्या फसवणूकीची बातमी वाचली. संबंधित व्यक्तीने ऑनलाईन वेब साईटव्दारे काही वस्तु मागवल्या व त्या हाती पडल्यावर पार्सल मधून फक्त कागदाची रद्दी निघाली. त्याचे काही हजार रूपये पाण्यात गेले. या व अशा प्रकारच्या ऑनलाईन खरेदीतून फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण मधून अधून ऐकतो, वाचतो व सोडून देतो. पण ह्या गोष्टी इतक्या सहजपणे घेण्यासारख्या नाहीत.
इंटरनेट व त्याचा वापर याचे प्रमाण सध्या प्रचंड वाढले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात इंटरनेटला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातच ई-बँकिंग व ई-शॉपिंग मुळे तर हे प्रमाण वाढले आहे. आजच्या धकाधकीच्या काळात ऑनलाईन व्यवहारांमुळे अनेक सोई झाल्या आहेत. पण त्याचप्रमाणे याची दुसरी बाजूपण तितकीच गंभीर आहे. इंटरनेटवरून फसवणूक करणारे पण तितकेच वाढले आहेत. मुळ वेबसाईटची नक्कल करून खोट्या जाहीरातीच्या माध्यमातून काही महाभाग सर्वसामान्य नागरिकांना * आर्थिक * चुना लावतात. आपण नेहमी जी संकेतस्थळे पाहतो त्यावर अनेक आकर्षक योजनांच्या जाहीराती असतात. बर्‍याच प्रमाणात सुट व बरोबर अनेक इतर वस्तु फुकट देण्याचे अमीष यात दाखवले जाते. तसेच अनेक टि.व्ही. वाहिन्यांनवर पण सतत ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहीत करणार्‍या जाहीराती व कार्यक्रम दाखविले जातात. यात अगदी पायाच्या नखा पासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्वांसाठी उपयोगी पडणारी उत्पादने दाखविली व विकली जातात. अर्थात सर्वच संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणूक होते असे नाही परंतु फसवणूकीच्या प्रमाण आहे हे कोणीच नाकारु शकत नाही.  ह्या फसवणुक करणार्‍यांना माणसाच्या स्वभावाची चांगली माहिती असते की माणूस प्रलोभनांना बळी पडतो. याचाच फायदा घेऊन ते गंडा घालतात. यात आपल्या बँक खात्यावर डल्ला घातला जाऊ शकतो. कारण या व्यवहारात जर क्रेडीत कार्ड/डेबीट कार्ड वापरले तर त्यावरून आपली सर्व माहिती घेऊन आपले बँक खाते रिकामे केले जावू शकते.
अशा प्रकारच्या फसवणूकीत ऑनलाईन लॉटरी, फसव्या ई-मेल व्दारे तुमची माहिती जमा करून ती तुमचे खाते व पैसे लाटण्यासाठी वापरली जाते. यामध्ये तुमचा पैसा वापरून कुठूनही खरेदी केली जाते व बिल तुमच्या नावे येते.  या व अशा प्रकारच्या फसवणूकी पासून आपल्याला जर वाचायचे असेल तर आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्या म्हणजे कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा पैशाचा व्यवहार करताना योग्या ती काळजी घ्यावी. आपल्या पैशाच्या व्यवहाराची माहिती कधीही ई-मेल व्दारे पाठवू नये. ज्या संगणकावरून आपण अशी खरेदी करत आहोत तो संगणक व ते ठिकाण खात्रीचे असावे. आपल्याला ज्या संकेत स्थळाची योग्य व खात्रीची माहिती आहे तेथूनच खरेदी करावी. कंपनीचा पत्ता नीट पहावा, फोन नंबर पहावा. जर नुसताच ई-मेल आपल्याला आला असेल तर अशा ठिकाणाहून खरेदी करू नये. संकेतस्थळाचे सुरक्षितता प्रमाणपत्र तपासावे. त्याची माहिती थोड्या वाचनाने मिळू शकते. कोणत्याही संकेतस्थळाच्या पत्त्यामध्ये नुसते http//: असेल तर त्यावर आपली माहिती सुरक्षित राहिलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे  https//: असे जर असेल तर या  ‘S’ अक्षराने तुमची माहिती सुरक्षित राहू शकेल याची  शक्यता वाढते. तसेच प्रत्येकाने आपला पासवर्ड थोड्या दिवसांनी बदलत रहावा, आपल्या व्यवहारांची नोंद ठेवावी, के्रडिट कार्ड नंबर, पासवर्ड कोणालाही सांगू नये. या व अशा काही गोष्टी एक नागरिक म्हणून आपण करू शकतो.
यात देशातील सरकार व न्यायव्यवस्थेनेपण महत्वपूर्ण कार्य करणे अपेक्षित आहे. भारतासारख्या देशात ऑनलाईन शॉपिंग हे जवळजवळ 2000 शहरे व गावांमध्ये पोहोचले आहे. यात बरेच जण ‘ कॅश ऑन डिलीव्हरी ‘  हा पर्याय न वापरता ई-पेमेंट करतात व अशा प्रकारे फसवणूकीला आयते आमंत्रण देतात. या फसवणूकीवर आपल्या देशात पुरेसे कायदे नाहीत. सर्वसामान्य माणूस याबाबत अजून अज्ञानी आहे. आपल्यासारख्या आय.टी. महासत्ता म्हणवणार्‍या देशात सायबर गुन्ह्यांविरूध्द कडक कायदेच नाहीत. त्यामुळे आरोपींवर वचक बसत नाही. ही बाब खेदाची आहे. दरवर्षी ग्राहक दिनाला जनजागृती फेर्‍या, पोस्टर, चर्चा केल्या जातात पण याविषयावर कितपत गांर्भियाने विचार होतो हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे जगभरात अशा प्रकारचे कायदे होत आहेत व अस्तीत्वातपण आहेत त्यामुळे आपल्या देशाने पण याचे महत्व ओळखून योग्य पावले उचलावीत आणि महत्वाचे म्हणजे ग्राहकांनी देखील जागरुक होणे आवश्यक आहे.

शनिवार, 15 मार्च 2014

केजरीवालजी, मिडीयावर का घसरता?

दिवसेंदिवस आपचे नेते वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत सापडत चालले आहेत. काल दिल्लीचे 49 दिवसांचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व मिडीया नमो नमो चा जप करीत असून आपण सत्तेवर आल्यास मिडीयावाल्यांना जेलमध्ये घालू अशी धमकीवजा इशारा दिला आहे. मिडीया नेहमी वस्तुस्थिती दर्शविण्याचेच कार्य करीत असतो. जेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल विराजमान झाले होते. तेव्हा सतत त्यांचाच उदोउदो सुरु होता. हे बहुधा केजरीवाल विसरले आहेत. म्हणजे त्यांच्या बाजूने बातम्या दाखविल्या की मिडीयावाले चांगले आणि इतरांच्या वस्तुस्थितीदर्शक बातम्या दाखविल्या की मिडीयावाले विकले गेले अशी जर केजरीवालांची विचारसरणी असेल तर यापुढील काळात केजरीवाल यांचा उदोउदो करणार्‍या मिडीयावाल्यांनी त्यांचे विनाकारण किती कौतुक करायचे याचा गांभिर्याने विचार करावा अशीच सामान्यांची भावना आहे.
सध्या देशात नमोची लाट आहे. हे कोणीच नाकारु शकत नाही. मध्यंतरी एका जाहीर सभेत बोलताना केजरीवाल यांनी अशी कोणतीच मोदी लाट नसल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. परंतु त्याच्या दुसर्‍याच दिवशी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मोदी लाट असल्याचे कबुल केले. दुतोंडी केजरीवाल यांच्या या दोन्ही क्लिप सोशल मिडीयावरुन फिरत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांनी राजा हरिश्‍चंद्राचा आव आणून दुसर्‍यांना मार्गदर्शन करण्याच्या फंदात पडू नये. यावेळी तरी दुसरे काय झाले. साधी राहणीचा देखावा निर्माण करण्यात धन्यता मानणार्‍या आपने नागपूरला चक्क दहा दजार रुपये द्या आणि केजरीवालांसोबत जेवण घ्या अशी योजना जाहीर केली याचा यथातथाच प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातच केजरीवाल यांनी मिडीया विकला गेला असल्याचे वक्तव्य केले. ते सर्व वाहिन्यांनी दाखविले. हा प्रकार रात्री झाला. सकाळी पत्रकारांनी कालच्या प्रकाराबाबत विचारले असता केजरीवाल यांचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा समोर आला. त्यांनी आपण असे म्हटले नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. मग काल कोण केजरीवाल यांचे भूत बोलले का ? असा प्रश्‍न आम आदमीला पडला आहे. बरं. इकडे केजरीवाल यांनी आपल्या वक्तव्याचा इन्कार केला असला तरी तिकडे दिल्लीत मात्र त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार बैठक घेऊन केजरीवाल यांच्या भूमिकेचे समर्थन केले. केजरीवाल यांना आम आदमीचे एकच सांगणे आहे, तुम्ही जे वक्तव्य करता त्यावर ठाम रहा. आज एक आणि उद्या दुसरेच असा दुतोंडीपणा कशासाठी?
सत्य आहे ते मिडीया दाखवित असेल तर त्यांंच्या नावाने खडे फोडण्यात काय अर्थ आहे? आपचे नेत्यांना प्रसिध्दीचे व्यसन लागले आहे. अर्थात ते मिडीयानेच लावले आहे. दिल्लीत सत्तेवर असताना केजरीवाल या नावाशिवाय मिडीयावाल्यांचा दिवस मावळत नव्हता. सतत विविध वाहिन्यांवर झळकत राहायचे याची सवय यामुळे केजरीवालांना लागली. आणि त्याचाच प्रत्यय काल डिनर पार्टीत सर्वांना आला. पुरावे दिल्याशिवाय तोंडाची बाष्कळ बडबड करण्यात काहीही अर्थ नाही. देशात आपबद्दल जी सहानुभूती होती ती कमी होत चालली आहे. भविष्यात आपच्या नेत्यांनी अशीच दुतोंडी वक्तव्ये केली तर आप नावाचा पक्ष अस्तित्वात होता अशी नोंद इतिहासात करावी लागेल.

 

बुधवार, 12 मार्च 2014

कसली तत्व? कसल्या निष्ठा?

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकारण्यांचे खरे स्वरुप उघड होऊ लागले आहे. आतापर्यत पक्षश्रेष्ठींची महती गाणारे राजकारणी नेते जेव्हा त्यांचे तिकीट कापले जाते तेव्हा त्याच पक्षाध्यक्षांच्या विरोधात आरोप करण्यातच आघाडीवर असतात असेच चित्र आहे. वास्तविक ज्या गोेष्टीची लाज वाटली पाहिजे त्याच गोष्टीचे संबंधित राजकारणी समर्थन करताना दिसतात तेव्हा मतदाराची मान शरमेने खाली जाते. सत्तेची नशा राजकारण्यांना अशी काही चढलेली असते की त्यामध्ये खंड पडला की त्यांना राहवत नाही. सतत सत्ता आणि सत्ता एवढेच त्यांना माहित असते. त्यामुळेच आपण सोडून दुसर्‍या कुणाला सत्तेचा प्रसाद मिळत असेल तर ते सरळ पक्षाला तिलांजली देऊन दुसर्‍या पक्षात प्रवेश करतात आणि दुर्दे:व म्हणजे इतर पक्षही त्यांचे जंगी स्वागत करुन त्यांनाच उमेदवारी देतात. निष्कर्ष काय तर तेच ते राजकारणी सतत सत्तेच्या खुर्चीवर बसतात आणि सामान्य कार्यकर्ता हा नेहमी कार्यकर्ताच राहतो.
राजकारणी मंडळी ही चालू असतात असाच सर्वसामान्य समज आहे. त्यावर अशा काही घटना समोर आल्या की शिक्कामोर्तब होते. दलबदलू आणि सत्तापिपासू राजकारणी मंडळींना खर तर जनतेनेच दिवसा तारे दाखवायला पाहिजेत. परंतु ते होताना दिसत नाही. एखाद्या पक्षात ज्यावेळी दलबदलू राजकारणी असतो त्यावेळी तो पक्ष निष्ठा आणि पक्षाची तत्वे याविषयी भरभरुन बोलत असतो. परंतु हा केवळ देखावाच असतो. ज्यावेळी त्याला तिकीट मिळत नाही त्यावेळी तोच दलबदलू नेत्याचा दुसरा चेहरा पहावयास मिळतो. मग त्याने यापूर्वी ज्या पक्षनिष्ठेच्या गप्पा मारलेल्या असतात त्याचे काय? की आपण केले ते नाटक होते असे त्याने सरळ कबुल करावे आणि आपण केवळ सत्ताप्रेमीच आहोत हे अभिमानाने सांगावे. हे राजकारणी इतके हुशार असतात की पक्षबदलाला तात्विक मुलामा देत त्यांचे कसे बरोबर आहे याचे दाखले देतात. जनता देखील त्यांच्या या भूलथपांनाच अनेकवेळा फसते आणि पक्ष न पाहता केवळ व्यक्ती पाहून त्याच्या मागे जाते. हे कोठेतरी थांबले पाहिजे.
पक्षबदलू नेत्यांना जनतेने वेळीच त्यांची जागा दाखविली तर भविष्यात असे अनेक पक्षबदलू नेते निर्माण होणेच थांबेल. महत्वाचा मुद्दा म्हणजे दुसर्‍यांना संधी द्यायला संबंधित पक्षबदलू नेत्यांना कमीपणा का वाटतो? आजन्म आपणच सत्ता भोगावी असाच त्यांचा समज असतो. म्हणून गंमतीने आण्णा हजारे असे सांगतात की, राजकारणी जेव्हा निधन पावतो तेव्हा त्याला असेच वाटत असते की स्मशानापर्यत मला खुर्चीवरुनच घेवून जावे. आण्णा हे उदाहरण गंमतीने सांगत असले तरी त्यामध्ये सत्य आहे हे कोणीच विसरु नये.
 

सोमवार, 10 मार्च 2014

मनसे विरोध सेनेला महागात पडणार!

महायुतीत मनसेला स्थान असावे जेणेकरुन मतांची फाटाफूट होऊ नये आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात खासदार निवडून द्यावेत अशी भाजपाची इच्छा होती. त्याकरिता भाजपाच्या काही नेत्यांनी प्रयत्नही केले. परंतु याला सेनेने खोडा घातला. प्रसंगी भाजपाच्या नेत्यांवर पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कडक भाषेत टिकाही केली. त्यामुळे भाजपा नेते मनातून दुखावले गेले होते. गडकरी, तावडे, शेलार यांनी घेतलेली राज यांची भेटीत काय चर्चा झाली याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता होती. त्यावरील पडदा काही प्रमाणात काल मनसेच्या वर्धापनदिनी उठला आहे. राज यांनी जी पहिली यादी जाहीर केली त्यावर नजर टाकली असता त्यांचे टार्गेट शिवसेनाच असल्याचे दिसते. त्याचवेळी त्यांनी मोदींना पाठिंबा देऊन भाजपा च्या मनात मनसेबद्दल सहानुभूती निर्माण केली आहे.
मनसे लोकसभेला उतरणार म्हणजे मतांची फाटाफूट होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. यामुळे निश्‍चितच कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील मनसेला मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहिली तर बहुतांशी ठिकाणी मनसे दोन क्रमांवर असल्याचे दिसते. याचाच अर्थ युतीचे उमेदवार अवघ्या काही फरकानेच निवडून आले आहेत. तर काही ठिकाणी मनसे आणि युती यांचे उमेदवार पडले असून तेथे आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. मागील अनुभव लक्षात घेता यंदा तरी युती आणि मनसे हे दोन्ही राजकीय पक्ष विचारपूर्वक निर्णय घेतील असे वाटत होते. परंतु इतिहासावरुन कोणीच काहीही धडा घेतल्याचे दिसत नाही.
जुने हेवे दावे विसरुन सेनेचे पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी टाळीसाठी प्रथम हात पुढे केलेला होता. म्हणजे मनसे महायुतीत यावी अशी सुरवातीस शिवसेनेची भूमिका होती. मग नंतर असे काय घडले? की शिवसेनेला मनसे बरोबर युती नकोशी वाटायला लागली. आता मनसेेचे उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उभे ठाकले आहेत. यामुळे शिवसेनेला विजय वाटतो तितका सोपा नाही. मनसेच्या पहिल्या यादीवर नजर टाकली असता लोकसभा निवडणुकीत मनसे आणि शिवसेना असाच सामना रंगणार असल्याचीच चिन्हे आहेत. याचा तोटा महायुतीलाच होणार अशीच चिन्हे आहेत.

शुक्रवार, 7 मार्च 2014

अतिआत्मविश्‍वास बरा नव्हे!

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी लोकसभेला महाराष्ट्रात युतीच्या जागा अधिकाधिक याव्यात यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मुंबई येथे त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे करु नयेत असे मत व्यक्त केले. यावर राज यांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नसतानाच शिवसेनेने आणि काही भाजपाच्या नेत्यांनीही या भेटीलाच आक्षेप घेत गडकरी यांच्यावर तोंडसुख घेतले. पाच जणात सहावा कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि सगळीच समीकरणे धुळीस मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
अर्थात ही समीकरणे केवळ लोकसभेपुरतीच होती. यंदाची लोकसभा निवडणुकीला अत्यंत महत्व आहे. नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी असाच सामना आहे. देशात मोदींची लाट आहे. भाजपाला 272 चा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न करण्यास भाजपा मागे पुढे पाहत नसल्याचेच दिसत आहे. नुकतीच त्यांनी रामविलास पासवान यांच्याशी युती करुन त्याचे संकेत दिले आहेत. बहुधा यामुळेच गडकरी यांनी मनसेला साकडे घातले असेल असे वाटते. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेने मोठ्या संख्येने मते मिळविली होती. अर्थात ते त्यांचे यशच म्हणायला हवे. परंतु शिवसेनेने आमची मते मनसेने खाल्ली हो! असा प्रचार केला. आणि मनसेला खलनायकाच्या भूमिकेत उभे केले. मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीला उभे राहिल्याने त्याचा फायदा कॉग्रेस आणि राष्ट्रवादीलाच झाला. आणि तेच पुन्हा एकदा सत्तेत आले. हा इतिहास आहे.
साहजिकच इतिहासा बदलण्यासाठीच आणि सेना भाजपाच्या मतांत फाटाफूट व्हायला नको या उद्देशाने गडकरी यांनी काही प्रयत्न केले असतील तर त्याला चुकीचे म्हणता येत नाहीत. भाजपाला आता एकेक जागा महत्वाची आहे. मनसेने त्यांचे उमेदवार उभे केले नाहीत तर सर्व मते युतीला पडतील अर्थात मोदींना पडतील असा साधा सरळ हिशेब गडकरी यांनी केला असल्याचेच दिसते. हे सर्वांना मान्य होणे अवघडच होते. आणि तसेच घडले. मागील  वेळी देखिल आत्मविश्‍वासच युतीला नडला होता. यंदा तरी यामध्ये काही फरक होईल असे वाटले होते. काही काही वेळा अतिआत्मविश्‍वास स्वत:च्याच नाशाला कारणीभूत होतो हेच खरे!

सोमवार, 3 मार्च 2014

विज्ञान प्रसाराची चळवळ राबवूया…

विज्ञान हे सध्या आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे अंग झाले आहे. त्यामुळेच विज्ञानरुपी वरदान आपल्याला लाभले नसते तर आज आपले जीवन कसे असते? ही कल्पनाही करवत नाही. कदाचित आपण आजही कंदिलाच्या प्रकाशात चाचपडत जंगलातच मुक्काम केला असता. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यत नानाविध विज्ञानरुपी उपकरणांशी आपली नाळ जोडली गेली आहे. टिव्ही, ङ्ग्रिज, मोबाईल, संगणक यासंह अनेक वस्तू आज चैन नव्हे तर गरजेच्या झाल्या आहेत. विज्ञान म्हणजे काय? असा प्रश्‍न विचारला तर अनेकजण गोंधळून जातात. परंतु साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर, आजूबाजूला घडणार्‍या घटनांना कोणते ना कोणते कारण हे असतेच. त्याचा शोध घेणे व त्याची उकल करणे थोडक्यात निरिक्षण व चिकित्सक प्रयोगातून मिळालेली पध्दतशीर, तर्कसुसंगत माहिती म्हणजे विज्ञान असे आपल्याला म्हणता येईल. असे असले तरीही आज समाजात अद्यापी अंधश्रध्देचा पगडा असल्याचेच जाणवते. लोकांच्यात विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी अनेक महानपुरुषांनी प्रयत्न केले आहेत. हे खरे आहे की, प्रत्येकजण काही शास्त्रज्ञ होऊ शकणार नाही मात्र ज्या गोष्टीचे कारण आपल्याला सापडत नाही अशा गोष्टींना दैवी न मानता त्यामागील विज्ञानाची बाजू शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे एवढे तरी आपण करु शकतो ना!
28 फेब्रुवारी हा दिवस देशात 1987 पासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी हाच दिवस निवडण्यामागील कारण म्हणजे याच दिवशी 1928 साली जगप्रसिध्द शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन अर्थात सी.व्ही.रामन यांनी रामन इङ्गेक्ट हा वैशिष्टपूर्ण शोधनिबंध प्रसिध्द केला होता. तो पुढे ‘रामन इङ्गेक्ट’ म्हणून जगभर मान्यता पावला. या शोधासाठी रामन यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळाले. रामन हे नोबेल मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते. पारदर्शी पदार्थातून एकरंगी प्रकाशाचे प्रखर किरण गेले तर काय होईल यावर संशोधन करीत असताना त्यांना मूळ एकरंगी प्रकाशाशिवाय इतर विविध कंपनसंख्या असणार्‍या रेषा वर्णपटलावर उमटलेल्या दिसल्या. यातूनच ‘पारदर्शक पदार्थातून जाताना प्रकाशाचे विकीरण होते हे त्यांनी सिध्द केले. यालाच ‘रामन इङ्गेक्ट’ असे म्हणतात.
भारताला वैज्ञानिक शास्त्रज्ञांची थोर परंपरा लाभली आहे. अगदी बाराव्या शतकातील भास्कराचार्य, आर्यभट्ट यांच्यापासून आधुनिक काळातील जगदीशचंद्र बोस, डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या, मेघनाद साहा, होमी जहांगीर भाभा, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, विक्रम साराभाई,सतीश धवन, जयंत नारळीकर नावे तर किती सांगावीत. शास्त्रज्ञ आणि विज्ञाननिष्ठ नेते यांच्यामुळेच आज आपण विज्ञानाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. यांच्या बरोबरच परदेशी शास्त्रज्ञांने विज्ञानयुगातील योगदान दुर्लक्षित करताच येणार नाही. समाज विज्ञाननिष्ठ व्हावा यासाठीच आपले सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारताला एकविसाव्या शतकात विज्ञानयुगात नेण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्यादृष्टीने पावले उचलण्यास प्रारंभ केला होता. आजघडीला राजीव गांधींचे स्वप्न बहुतांशी प्रमाणात सत्यात उतरल्याचे आपण पाहत आहोत. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी देखिल येथील विज्ञाननिष्ठ युवकपिढीवर विश्‍वास ठेवूनच भारताला 2020 सालापर्यत विकसित राष्ट्रांच्या पंगतीत बसविण्याचे स्वप्न पाहिले आहे. ते निश्‍चित पूर्ण होईल असा विश्‍वास भारतीयांना आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे कट्टर विज्ञाननिष्ठ होते. ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ या लेखातून त्यांनी विज्ञानाची कास धरलेला युरोप आणि श्रृतीपुराणाची महती गात बसणारे भारतीय यांची वास्तवनिष्ठ तुलना केली आहे. सावरकर म्हणतात,‘ भारतास काळाच्या तडाख्यातून वाचवायचे असेल तर ज्या श्रृतिस्मृतिपुराणोक्ताच्या बेडीने कर्तृत्वाचे हातपाय जखडून टाकले आहेत ती तोडलीच पाहिजे. ती बेडी तोडणे सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. युरोप चार शतकापूर्वीपर्यंत धर्माच्या अपरिवर्तनीय सत्तेचा दास झालेला होता. आणि त्यापायी आपल्यासारखाच दुर्गतीस पोहचला होता. पण त्याने बायबलास दूर सारुन विज्ञानाची कास धरताच अप – टु – डेट बनला. युरोप गेल्या चारशे वर्षात आमच्यापुढे चार हजार वर्षे निघून गेला. तसे आपल्या भारतीय राष्ट्रासही होणे असेल तर, ‘पुरातनी’ युगाचा ग्रंथ मिटून, ही प्राचीन श्रृतिस्मृतिपुराणादि शासने गुंडाळून आणि केवळ ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात ठेवून आपण विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे.’
 विज्ञान दिनाच्या पार्श्‍वभूमीवर थोर शास्त्रज्ञ आणि महान विज्ञानप्रेमी विचारवंत यांच्या विचारांचा जागर केलाच पाहिजे. परंतु तेवढेच करुन न थांबता आपणास काय करता येईल यावर देखिल विचार करुन तो कृतीत आणला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन हाच आधुनिक जीवनाचा पाया बनण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. अजूनही कित्येकजणांच्या मानेवर जात, धर्म, पंथ, कालबाह्य रुढी, अंधश्रध्दा यांचे जोखड आहे. त्यांना त्या जोखडातून मुक्त करुन विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीमधील एक घटक कसे बनविता येईल यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत. पालकांनीही मुलांना लहानपणापासून विज्ञानाची गोडी लावली पाहिजे. चला तर मग, विज्ञान दिनाच्या निमित्ताने केवळ एक दिवसापुरतेच उपक्रम साजरे करुन न थांबता सातत्याने विज्ञान प्रसाराची चळवळ राबवूया.

सबका विनाश…

उत्तरप्रदेश येथे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नेहमीप्रमाणे दणदणीत सभा झाली. त्याअगोदर त्यांनी एका हिंदी दैनिकाला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी तिसर्‍या आघाडीची खिल्ली उडवली. तसेच सभेत यंदाच्या निवडणुकीत सबका अर्थात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि कॉग्रेस यांचा विनाश अटख असल्याचे भविष्य वर्तविले आहे. निवडणुकीचे मैदान जवळच आहे. त्यामुळे खरेच सबका विनाश होतो का? ते लवकरच समजेल.
काही राजकारण्यांना जनमानसाची नस समजलेली असते. त्यामध्ये प्रमुख नाव म्हणजे नरेंद्र मोदी यांचे आहे. लोकांच्या मनात काय चाललेले आहे? याचा अचूक अंदाज त्यांना येतो आणि त्यानुसारच ते सभेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना आपण नेहमीच पाहतो. गुजरात येथे झालेल्या गोध्रा दंगलीचे भांडवल विरोधी पक्षांकडून नेहमी  करण्यात येते. परंतु जे आरोप करतात त्यांच्या राजवटीत किती दंगली झाल्या आहेत हे देखील त्यांनी कधीतरी पाहिले पाहिजे. उदाहरणच घ्यायचे तर  समाजवादी पक्षाच्या राजवटीत अवघ्या एका वर्षात 150 च्या वर दंगली झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या मुझफ्फरनगर दंगलीने दिलेल्या जखमा उत्तरप्रदेश विसरलेला नाही. तर बसपाने उत्तरप्रदेशात काय दिवे लावले ते जनतेने पाहिले आहे. कॉग्रेस विरोधी लाट असल्याने यंदा लोकांना परिवर्तन हवे आहे. साहजिकच गुजरात येथे विकास करुन दाखविलेल्या नरेंद्र मोदी यांची त्सुमानी आल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. आतापर्यत मागील बारा वर्षाच्या कालावधीत मोंदींना पध्दतशीर त्रास देण्याचे अनेक उद्योग कॉग्रेस सरकारने केले परंंतु त्यात त्यांना यश आले नाही. गुजरात येथील जनतेने मोदींना सलग तीन वेळा प्रचंड बहुमत देऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान केले. हे विसरुन कसे चालेल? यंदा मोदी लाट आहे हे कोणीही मान्य करील.
कॉग्रेसने केलेल्या कामांच्या विविध जाहिराती सध्या वाहिन्यांवरुन सुरु आहेत. त्यामध्ये कॉग्रेस शासनाने बक्कळ पैसा खर्च केला आहेे. परंतु हाच पैसा जर खर्‍या अर्थाने विकासाच्या कामाकरिता वापरला असता तर ते योग्य झाले असते असे नागरिकांचे मत आहे. यासह कॉग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर ज्या लोकाभिमुख घोषणांचा सपाटा लावला आहे त्या पाहिल्या की मतांच्या राजकारणाशिवाय दुसरे काय दिसते. जनता आता तेवढी निश्‍चितच सुज्ञ झाली आहे. महत्वाचे म्हणजे कॉग्रेस नेत्यांची मोदींच्या विरोधात ज्या प्रकारची भाषा वापरण्यास प्रारंभ केला आहे तो पाहिले की कॉग्रेसीजनांचा तोल सुटला असल्याचेच दिसते. विरोधकच बावचळलेले असल्यामुळे सबका विनाश होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.