बुधवार, 9 अप्रैल 2014

केजरीवाल्यांच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आम आदमीच!

49 दिवसांचे दिल्लीतील मुख्यमंत्रीपद भुषविणार्‍या अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीतील एका रोड शोमध्ये एका सामान्य रिक्षावाल्याने सणसणीत कानाखाली लगावली. आणि प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने त्याचा आवाज संपूर्ण देशात ऐकायला गेला. यानंतर केजरीवालयांच्या शांततामय समर्थकांनी कानाखाली लगावणार्‍या रिक्षावाल्याची धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. नेहमीप्रमाणे केजरीवाल यांनी आपल्या समर्थकांना शांततेचा उपदेश केला. हे असे तिसर्‍यांदा झाले आहे. म्हणजेच यापूर्वी केजरीवालांवर तिनदा हल्लयाचा प्रयत्न झाला आणि तो आम आदमीनेच केला होता. आता केजरीवाल यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत महत्वाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे, तो म्हणजे माझ्यावर हल्ला करणार्‍यांच्या मागील मास्टरमाईंड कोण? परंतु याचे साधे सरळ उत्तर जनतेच्या मनात आहे ते म्हणजे आम आदमी!
केजरीवाल यांचे वागणे कसे दुतोंडी आहे यावर वारंवार शिक्कामोर्तब झाले आहे. केजरीवाल वास्तविक पूर्णपणे नास्तिक आहेत. परंतु ज्यावेळी ते वाराणसीला गेले त्यावेळी त्यांनी गंगेत एकदा नव्हे तर अनेकदा डुबकी मारली. कारण फोटोग्राफरना चांगली पोजच मिळत नव्हती. त्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन माथा टेकला. काय हे सर्व करायची गरज होती. तुम्ही नास्तिक आहात तर निडरपणे जनतेसमोर जा ना! की, मी नास्तिक आहे त्यामुळे मी गंगेत डुबकी मारणार नाही आणि शिवमंदिरात जाणार नाही. परंतु प्रत्येक ठिकाणीच वागणे दुहेरी असल्याने केजरीवाल त्यांच्या परंपरेला जागले. यात चुकीचे काहीच नाही. आज दिल्लीतील रॅलीत एका रिक्षावाल्याने केजरीवालांना प्रथम पाच ते दहा रुपयांचा हार घातला आणि मग त्यांच्या सणसणीत कानाखाली लगावली. ही थप्पड एवढी जोरात होती की, केजरीवाल यांचा गाल सुजला. यानंतर त्यांनी रॅली अर्धवट सोडून तत्काळ म. गांधीजींच्या राजघाटावर धाव घेतली आणि आण्णा स्टाईल धरणे आंदोलन केले. ही नौटंकी आता जनतेला माहित झाली आहे.
इथे एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. मध्यंतरी बिहार येथे  भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा सुरु होण्याअगोदर सभाठिकाण बॉम्बस्फोटाने दणाणून गेले होते. असे असले तरीही कोणाही न घाबरता मोदी यांनी जमलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधित केले. आणि जनतेने देखिल बॉम्बच्या भितीने सभास्थानापासून काढता पाय न काढता संपूर्ण सभा शांततेत ऐकली. दुसरीकडे दिल्लीत केजरीवाल यांच्याच आम आदमीने त्यांच्या कानाखाली लगावल्यावर केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचार रॅली अर्धवट सोडून तेथून पळ काढला. याला काय म्हणायचे? असाच प्रश्‍न सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
आम्ही अहिंसेवर विश्‍वास ठेवतो असा केजरीवाल यांचा दावा आहे. मग असे असेल तर म. गांधीच्या तत्वज्ञानानुसार एका गालावर थप्पड मारल्यावर केजरीवाल यांनी दुसरा गाल पुढे करायला पाहिजे होता. मात्र घडले उलटेच कानफटात लगावणार्‍या त्या रिक्षावाल्यालाच केजरीवाल समर्थकांनी बेदम चोपले. खरं तरं केजरीवाल यांनी हिंसा करणार्‍या त्यांच्या समर्थकांना पक्षातून तत्काळ निलंबित करायला पाहिजे होते. परंतु नेहमी दुतोंडीपणाचा वारसा जपणार्‍या केजरीवालांकडून ही अपेक्षा करणे कितपत योग्य आहे?
या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण? हा प्रश्‍न विचारुन केजरीवाल आता राजकीय सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेच दिसते. विरोधी पक्ष या थराला जातील असे वाटत नाही. त्यामुळे दुसर्‍यावर आरोप करण्यापेक्षा केजरीवाल यांनी त्यांच्या वर्तवणुकीचाच आढावा घेणे गरजेेचे आहे. याचेही राजकारण केल्यास केजरीवाल यांचा आप पक्षालाच तोटा होईल आणि निवडणुकीच्या माध्यमातून जनताच आप पक्षाला सणसणीत उत्तर देईल असेच चित्र आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें