शुक्रवार, 10 जनवरी 2014

कोल्ड्रिंग प्यायलाच हवीत का?

कोल्ड्रिंग आज तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. कोठेही हॉटेलमध्ये गेले की हातात कोल्ड्रिंगची बाटली असायलाच हवी असा अलिखित नियमच झाला आहे. यामध्ये अनेकांना समाधान वाटते. हॉटेलात जाऊन देखिल पिझ्झा आणि बर्गर खाताना जर कोल्डिंग घेतले नाही तर तो मुर्ख आहे अशी त्यांची विचार करण्याची पध्दत तयार झाली आहे. परंतु कोल्डिंग न पिणाराच आज खर्‍या अर्थाने शहाणा आहे. भारतीय संशोधकांनी अथवा अभ्यासकांनी जर सांगितले की कोल्डिंग पिणे आरोग्यास हानीकारक आहे. तर ते मत आपण कचर्‍याच्या टोपलीत फेकून देण्यात धन्यता मानू. पण आता जपानच्या संशोधकांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जपानच्या ओसाका विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कुल ऑफ मेडिसीनने यावर दोन वर्षे नऊ महिने अभ्यास करुन कोल्ड्रिंग पिण्याने किडनी खराब होते असा निष्कर्ष मांडला आहे.
आझादी बचाओ आंदोलनाचे सर्वेसर्वा राजीव दिक्षीत तरी दुसरे काय सांगत होते? कोल्ड्रिंग पिणे आरोग्यास अत्यंत अपायकारक असल्याचे मत ते साधार पटवून देत होते. परंतु त्याला किती भारतीयांनी गांभिर्याने घेतले ? त्यांच्या नई आझादी या मासिकात तसेच त्यांच्या फेसबुकच्या पानावर आपण आवडीने पित असलेल्या कोल्ड्रिंगने संडास उत्तम प्रकारे स्वच्छ होतो. याबाबत जागृती करण्यात आली होती. यु ट्युबला तर याबाबतची व्हिडीओ क्लिपच आहे. यावरुन त्यामध्ये किती रासायनिक पदार्थ मिसळलेले असतात हेच दिसून येते ना? मग ज्या कोल्ड्रिंगने संडास साफ होतो ते कोल्ड्रिंग आपण यापुढे पिणार का? याचा प्रत्येकाने गांभिर्याने विचार केला पाहिजे.
विदेेशी कंपन्या येथे आपले बस्तान बसवतात. तरुणाई ज्यांना आयडॉल मानतो त्यांना त्यांच्या उत्पादकांच्या जाहिराती करायला सांगतात. आणि येथील बहुसंख्य तरुण आयडॉलकडे पाहून त्यांची उत्पादने आंधळेपणाने विकत घेतात. आणि विदेशी कंपन्या येथील नागरिकांच्या खिशातील पैसा त्यांच्या देशात नेतात. याकरिताच म.गांधी यांनी स्वदेशीची चळवळ सुरु केली होती. परंतु स्वातंत्र्य मिळाले तशी ही चळवळही मागे पडली. महत्वाचे म्हणजे आयडॉलनी सुध्दा आपण ज्याची जाहिरात करतो त्यामुळे नागरिकांचे आरोग्य तर धोक्यात येणार नाही ना? याची काळजी घ्यायला हवी. परंतु ते होताना दिसत नाही. कोल्ड्रिंग ऐवजी जर आपण पारंपारिक पेये घेतली म्हणजे ताक, मठ्ठा, लिंबू सरबत, लस्सी तर ते 100 टक्के आरोग्यास हितकारकच आहे. त्याची जाहीरात कोणी करीत नाही. पण आरोग्यास हितकारक तीच आहेत. त्याचा वापर आपण अधिकाधिक केव्हा करणार हाच प्रश्‍न अनुत्तरीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें