गुरुवार, 9 जनवरी 2014

लाज वाटते…

सध्या सोशल मिडीयावर एक चित्र धुमाकूळ घालत आहे. त्यामध्ये आपच्या खांद्यावर मान ठेवून विश्‍वासाने जनतारुपी महिला विसावली आहे. तर तिच्या शेजारी बसलेल्या कॉग्रेसरुपी महिलेशी आपचा नायक पाठीमागून हातमिळवणी करतो आहे. एकाच चित्रातून खूप काही आशय व्यक्त होत आहे. हे चित्र हसण्यावारी नेल्यासारखे नाही. कारण राष्ट्रीय प्रश्‍नांवर आता केजरीवाल पहिल्यांदा राहुल गांधीचे आणि नरेंद्र मोदींचे मत विचारा असा अजब सल्ला पत्रकारांना देत आहेत. केजरीवाल यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. असे असल्यामुळे प्रत्येक प्रश्‍नांवर त्यांच्या पक्षाची ठोस भूमिका असायलाच हवी. परंतु जनतेला लाज वाटावी अशी वस्तुस्थिती समोर आली आहे. प्रख्यात पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या वक्तव्याची एक पोस्ट सोशल मिडीयावर फिरते आहे. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी ऑन कॅमेरा मुलाखत देण्याअगोदर काही अटी समोर ठेवल्या होत्या. त्यानुसार आतंकवाद, सांप्रदायिक िंहंसा बील, कश्मीर, जनसंख्या विस्फोट आणि बांगलादेशी घुसखोर या पाच प्रश्‍नांवर एकही प्रश्‍न विचारायचा नाही. आणि तसा प्रयत्न सरदेसाई यांनी केला असता केजरीवाल स्टुडिओ सोडून निघून गेले. ज्या पक्षाला राष्ट्रीय प्रश्‍नांवर भूमिकाच नाही तो पक्ष देशाचे भले काय डोंबल करणार? असाच प्रश्‍न सामान्यांना पडला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत की, तुम्ही रस्ते, पाणी, वीज हे प्रश्‍न सोडविले आणि जर देशाचे रक्षण करु शकला नाहीत तर त्या विकासाला काहीही अर्थ नाही. नवीन जन्मास आलेल्या आपचे दुसरे काय चालले आहे. त्यांचे नेते प्रशांत भूषण काश्मिरमधून सैन्य काढून घेण्याबाबत डोके फिरल्यासारखे बडबडत आहेत. आणि केजरीवाल यांनी राजकीय वेश धारण करुन भूषण यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे सांगून हात झटकले आहेत. दिल्ली सर काबीज केल्यावर आता आपला देश जिंकायची स्वप्ने पडू लागली आहेत. अर्थात ती पडलीच पाहिजेत. कारण माणसाने नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत असे म्हणतात. परंतु ती पाहताना तुमचा बेस भक्कम असलाच पाहिजे. काल दिल्लीत पत्रकारांनी दिल्लीत केजरीवाल यांना भेटून राष्ट्रीय प्रश्‍नांवर त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी केजरीवाल यांनी प्रथम मोदींचे आणि राहुल गांधीचे मत विचारा ते मला सांगा त्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन असे धक्कादायक वक्तव्य केले. असे मत एखाद्या कार्यकर्त्याने व्यक्त केले असते तर चालले असते. परंतु आप पक्षाचे सर्वेसर्वे असणार्‍या केजरीवाल यांनी ज्यावेळी अशी फालतू भूमिका जाहीर केली त्यावेळी जनतेला हा खूप मोठा हादरा होता.
केजरीवाल यांनी ज्या पाच मुद्दयावर भाष्य करण्याचे टाळले आहे. नेमके तेच मुद्दे मोदी आणि राहुल यांनी उचलले आहेत. जनतेला देखिल राष्ट्रीय प्रश्‍नांवर कोण अ्राक्रमक आहे हेच पाहायचे आहे. गुजरात मध्ये मोदी केवळ वीज, पाणी, रस्ते यातच अडकून पडले नाहीत. तर त्यांनी गुजरातच्या सीमा अशा भक्कम केल्या की गोध्रा नंतर एकही दंगल होऊ शकलेली नाही. उदया समजा आपचे सरकार सत्तेवर आले की, केजरीवाल भूषण यांना परराष्ट्रमंत्री करतील आणि भूषण सार्वमतची नाटके करुन काश्मिरमधून सैन्य काढून घेईल. आणि केजरीवाल म्हणतील हा निर्णय भूषण यांचा व्यक्तिगत निर्णय होता. त्याच्याशी माझे काही देणेघेणे नाही. माझे हात स्वच्छ आहेत. काय करायचे ते स्वच्छ हात?
यापूर्वी देखिल प्रसारमाध्यमांनी देशाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आताही देशाला भेडसवणार्‍या महत्वाच्या प्रश्‍नांवर प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना अथवा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणार्‍या उमेदवारांना त्यांची भूमिका जाहीर करायला लावणे अत्यावश्यक आहे. अर्थात तसे जरी झाले नाही तरी आता जनतेला राष्ट्रीय प्रश्‍नांवर कोणाची भूमिका रोखठोक आणि योग्य आहे? हे लक्षात आले आहे. भविष्यकाळात राष्ट्रीय प्रश्‍नांपासून पळ काढणार्‍या पक्षाला जनता मतदानरुपी शस्त्राने असा चोप देतील की त्यांना दिवसा आकाशात तारे चमकताना दिसतील हे नक्की!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें