शनिवार, 21 दिसंबर 2013

भागवतपुराण!

मध्यंतरी भारतीय जनता पक्षात आडवाणी विरुध्द मोदी असा सामना पहावयास मिळाला होता. यामधून दोघांच्यात विनाकारण दरी वाढत चालली असल्याचे चित्र दिसले. त्याचाच परिपाक म्हणून आडवाणी  यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन आपली  नाराजी व्यक्त केली. परंतु भाजपाची मातृसंस्था असलेल्या रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी आडवाणींची भेट झाल्यावर सर्व काही निवळले. आणि प्रसारमाध्यमांना नवीन विषय शोधणे भाग पडले. त्याकाळी काही अतिउत्साही तरुणांनी आडवाणींच्या घरासमोर जाऊन निदर्शनेही करीत मोदींचा जयजयकार केला होता. काहीही झाले तरी ज्येष्ठ असलेल्या आडवाणी पक्षातच राहवेत आणि नव्या नेतृत्वाला सल्ला द्यावा अशीच भाजपा कार्यकत्यार्र्ंची इच्छा होती. आणि ती भागवत भेटीने पूर्ण झाली. त्यावेळी भागवत यांनी इतरांबद्दल कोणतीच टिप्पण्णी केली नव्हती. परंतु नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी कोणाचेही नाव न घेता योग्य शब्दात टिका केली आणि आडवाणींचे स्थान पक्षात किती आवश्यक आहे ते अधोरेखीत केले.
दिल्ली येथे आडवाणी यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी पुराणकालातील एक गोष्ट सांगितली. ती पुराणकालातील असली तरी त्याचा संदर्भ आजच्या भाजपा नेते तसेच कार्यकर्त्यांच्या व्यवहाराशीच होता. हे सुज्ञांना लगेच कळले. नाहीतर पुस्तक समारंभाला पुराणकालीन कथा त्यांनी कशाला सांगितली असती? काय होती ती गोष्ट? पाहूया, एका गावात एक महिला असते. त्या महिलेचे वास्तव्य गावात असल्याने त्या गावाची भरभराट होते. एकेकाळी तीला मानाचे स्थान असते. परंतु कालांतराने त्या महिलेलीच निंदानालस्ती गावातील लोक करु लागतात. त्यामुळे ती महिला वैतागते आणि गाव सोडून जायचे निश्‍चित करते. आणि त्यानुसार कार्यवाही देखिल करते. महिलेने गावाची वेस ओलांडताच काही दिवसातच गावाची पूर्ण रयाच जाते. आपापसात भांडणे सुरु होतात, दंगली भडकतात आणि काही महिन्यातच गाव बेचिराख होतो. अशी ती कथा. आता त्या महिलेच्या जागी आडवाणी आणि गावाच्या ठिकाणी पक्ष हा शब्द घालून कथा वाचा बरं! त्यातून काय सूचित होते?
आडवाणींनी मोदीविरोध एवढा करायला नको होता असेच अनेकांचे मत आहे. ज्यावेळी पक्षप्रचार प्रमुख म्हणून नाव घोषित केले त्यावेळी आडवाणी आणि त्याचे खास सहकारी मुद्दामहून गोवा येथे गेले नाहीत ही वस्तुस्थिती कोणीच नाकारु शकत नाही. परंतु काहीही असले तरी आडवाणी यांनी पक्ष वाढविण्यासाठी अतिशय कष्ट उपसले आहेत हे देखिल भाजपा कार्यकर्ते विसरु शकत नाहीत. जीवनप्रवासात त्यांनी घेतलेले निर्णय सर्वांनाच आवडतील असे नाही. परंतु त्यांचे जीवन पारदर्शकपणे सर्वाच्या समोर आहे.भविष्यकाळात कोणीही आडवाणींना कोणीही कमी लेखू नये आणि जर आडवाणींनी पक्षाला राम राम केला तर पक्षाची अवस्था लवकरच त्या गावासारखी होईल असा सूचक इशारा तर भागवत यांनी पुराणाचा दाखला देऊन दिला नाही ना? असाच प्रश्‍न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें