सोमवार, 6 जनवरी 2014

गोवंशहत्या बंदीचा कायदा कशाला ?

शिर्षक वाचून दचकलात ना!  पण दचकू नका कारण आज देशात बरेच कायदे आहेत परंतु ते पाळण्यात किती जणांना धन्यता वाटते? हा खरा प्रश्‍न आहे. अनेक लोकांची तर कायदे हे मोडण्यासाठीच असतात अशीच मानसिकता झालेली असते. त्यामुळे हा नवा कायदा करुन काहीही उपयोग होणार नाही. हुषार माणसे कायद्याला पळवाटा शोधतात आणि आपल्याला हवे तेच करतात. गोवंशहत्या बंदीचा कायदा करण्याऐवजी जर देशातील संत महंत, वारकरी समाज आणि गोप्रेमींनी जनजागरण करुन गोहत्या करणार्‍यांची आणि कसाईखान्यात गाई विकणार्‍यांची मानसिकता बदलली आणि लोकशाही मार्गाने परंतु प्रचंड जनसमुदायाच्या साथीने जर गोहत्या रोखण्यासाठी आंदोलने केली तर सत्ताधारी देखिल व्होट बँकेसाठी का होईना अल्पसंख्यकांच्या लांगुलचालनाला फाटा देऊन गोप्रेमींच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेले चित्र पहावयास मिळेल.आणि हा प्रश्‍न कायदा करुन सुटण्यापेक्षा लवकर सुटेल .
गोमातेवर शेतकर्‍यांचे अर्थकारण अवलंबून असायचे. म्हणजे आताही आहे परंतु प्रमाण कमी कमी होत आहे. पूर्वी प्रत्येक शेतकर्‍यांकडे हमखास गाय, बैल असायचेच. परंतु आता मॉडर्न जमाना आहे. हल्ली बहुतेकांच्या दारात ट्रॅक्टर लावलेला असतो. गोमाता प्रत्येक शेतकर्‍यांकडे असली तरी बैल त्यांच्याकडे असेलच याची शाश्‍वती नाही. ज्यांच्याकडे आहे. त्यांना वाढत्या महागाईमुळे बैलाच्या चार्‍याचा खर्च झेपतोच असे नाही. यामुळेच मध्यंतरी दुष्काळ पडल्यावर पाळलेल्या गोधनाला चारा द्यायला पैसे नसल्याने कवडीमोल दराने स्वत:चे गोधन कसायांना विकले. ही परिस्थिती बर्‍याच ठिकाणी आहे. गोधन विकण्याऐवजी त्या गाई जर गोशाळेत दिल्या असत्या तर अनेक गाईंच्या मानेवरुन फिरणारी सुरी तरी वाचली असती. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे गाईपासून आपल्याला सर्व काही मिळते. दूध, शेण, गोमूत्र यांचा तर उपयोग आहेच परंतु गाय मेल्यावरही तिचा उपयोग आहे. असे असतानाही भारतातून कित्येक टन मांस परदेशात निर्यात होते. त्यामध्ये गोमांस देखील लक्षणीय प्रमाणात असते ही गोष्ट गौरवाची आहे का? महाभारत काळात दुधाचा महापूर होता. कोणालाही दूध, तूप कमी पडत नव्हते. परंतु सध्या काय स्थिती आहे. दुधाचे दर दिवसेंदिवस वाढत असून ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर आश्‍चर्य वाटायला नको. दिवसागणिक होत असलेल्या गोहत्या याला जबाबदार नाहीत का? सध्या प्रत्येक महिन्याला देशात सुमारे २ लाख गोवंशाची कत्तल करण्यात येते. ही संख्या अशीच वाढत गेली तर भविष्यकाळात गोवंशाची संख्या अल्प होईल.
कोणतेही प्रश्‍न कायदा करुन सुटणार नाहीत. खून केला तर फाशीची शिक्षा आहेच ना? परंतु खूनाचे प्रमाण कमी झाले आहे का? बलात्कारांचे प्रमाण वाढतच चालले आहे. जर गोहत्या बंदीचा कायदा केला तर गोहत्या थांबेल असे वाटते का? छुप्या रितीने ती सुरु राहणारच. सध्या काही संप्रदायाचे लोक विशिष्ठ दिवशी सर्रास खुलेआम गोहत्या करतात. ही बाब गोप्रेमींच्या ध्यानात येताच मुठभर गोप्रेमी धाडसाने घटनास्थळी दाखल होतात. आणि याचा विरोध करतात. आणि पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करतात. परंतु जर गोहत्या रोखण्यासाठी काही हजारांचा जमाव घटनास्थळी गेला.आणि संबंधिताला योग्य त्या परिभाषेत समजावले तर पुन्हा त्याची गाय कापण्याची हिंमत होईल का? राज्यकर्त्यांना देखील केवळ मतांची भाषा कळते. आपण जर गोहत्या करणार्‍यांना पाठीशी घातले तर आपले निवडणुकीत खरे नाही अशी जरब त्याला बसली पाहिजे. कारण गोहत्या रोखण्याच्या विरोधात हजारो जण एकजुटीने उभे आहेत याची नेत्यांना खात्री पटली की गोहत्या करणार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आणि त्यांचे फालतू लांगुलचालन करण्याचे धाडस कोणी करेल का?
वास्तविक महाराष्ट्र शासनाने १९७६ मध्ये गोरक्षणाच्या संदर्भात अ‍ॅनिमल प्रिझर्वेशन अ‍ॅक्ट ,१९७६ हे विधेयक (अ‍ॅक्ट) पारित केला आहे. परंतु त्याची माहिती अद्यापही कित्येकही पोलीस ठाण्यापर्यत पोहचलेली नाही. २००३ नंतर या विधेयकाचा आधार घेतच गोरक्षकांनी गोहत्या रोखण्यासाठी विविध समित्या स्थापन करुन गोहत्या रोखण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. आता देखिल वारकरी समाजाने जोपर्यत गोहत्याबंदी कायदा होत नाही तोपर्यत शासकीय महापूजा होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांना रोखण्यात त्यांना यश आले. पण अखेर पालकमंत्र्यांच्या हस्ते म्हणजेच शासकीय व्यक्तीच्या हातून पूजा झालीच. असो. अहिंसा संघातर्फे गोहत्या रोखण्यासाठी देशभर जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी व्हायला पाहिजे. सध्या काही राज्यामध्ये गोहत्याबंदी कायदा आहे. पण तेथेही गोहत्या होत नाही असे छातीठोकपणे तेथील गोप्रेमी तरी सांगू शकतील का?  मागील दहा वर्षात २ लाख ५६ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. परंतु जे शेतकरी देशी गाय पाळत होते त्यांनी आत्महत्या केल्या नसल्याची माहितीही मध्यंतरी समोर आली होती. याचा अर्थच गाय ही कुटुंबाची पोषणकर्ती आहे हा संदेश सर्वापर्यत पोहविला पाहिजे. प्रत्येकांनी आपल्याला जमेल तसा गोरक्षणाच्या कार्यास हातभार लावला आणि गोहत्या रोखण्याकरता गोरक्षणाकरिता झटणार्‍या मान्यवरांनी आंदोलनाची हाक दिल्यास त्यामध्ये प्रचंड संख्येने सहभाग घेतला तर गोहत्या भारतात जवळजवळ बंद झालेली आपणास पहावास मिळेल. गरज आहे ती सामुहिक इच्छाशक्ती आणि कृतीची!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें